अमरावती : शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांची गुणवत्ता राखून सहकार्य करणारा आधारस्तंभ अशी ओळख असणाऱ्या शिक्षण मंच मार्फत नेहमीच नाविन्यपूर्ण आणि काळानूरुप अत्यावश्यक असलेल्या विषयांना हाताळण्यात येते. आज देशभरात शिक्षण मंचाचे नाव अत्यंत नावाजलेले असून अनेक स्तरांमधून मंचावर दृढ विश्वास दर्शविण्यात येत आहे.अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची स्वतंत्र महिला शाखा राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महिला प्राध्यापकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी स्वतंत्र मंच उपलब्ध व्हावा आणि महिलांनी आपल्या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत ठेऊन, नेतृत्वगुण विकसित करून तसेच संघटित होऊन कार्य करावे या उद्देशाने “स्वयंसिद्धा” जाणीव -जागृती या कार्यशाळेचे आयोजन शिक्षण मंच अध्यक्ष मा.प्रा.प्रदिप खेडकर यांच्या कुशल नेतृत्वात आणि मार्गदर्शनाने २०१८ मध्ये यशस्वीपणे पार पडले.
आज समाजामध्ये विविध विषय ऐरणीवर आहेत परंतु महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे कारण आपल्या देशात लोकसंखेच्या प्रमाणात ५०% महिला आहेत. समाजात महिलांचे स्वत:चे भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी, महिलांना स्वत:कडे आणि समाजाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची ताकद मिळावी आणि एकमेकींच्या सहभागाने व सहकार्याने सकारात्मक बदलाकडे एकत्रितपणे पुढे जाता यावं त्याचप्रमाणे महिलांनी सज्ज होणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंगभूत क्षमता, कौशल्य व धाडस यांचा मेळ घालून नव्या उमेदीने सकारात्मक विचारांची जोपासना करून जीवनातील उदात्त ध्येय गाठणे आवश्यक आहे.
महिलांच्या विकासावरती शिक्षण क्षेत्राचे भवितव्य व गुणवत्ता निर्भर आहे. उच्चशिक्षणामुळे स्त्रीला ज्ञानाची कवाडे खुली होतात. ती जगाकडे डोळसपणे पाहू शकते, पाहू लागते. अधिक अभ्यास करून नवीन ज्ञाननिर्मिती करण्याची उर्मी तिच्या मनात जागृत होऊ शकते. दॆशाचा व्यापक विकास, वारसा व सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी भारतीय महिला मोलाचे योगदान आज देत आहेत.पुढील पिढी घडवत असताना शिक्षकांवरती मुळातच जास्त जबाबदारी असते त्यामुळे महिला जर अधिकाधिक एकाग्रतेने व कुशलतेने लक्ष देऊन योगदान देऊ शकल्यास निश्चितच उज्वल पिढी घडू शकेल. परंतु हि एकाग्रता आणि कुशलता महिलांना येण्यासाठी काही बाबींची आज नितांत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे केवळ शिक्षक हि एकमेव भूमिका न ठेवता त्याच्या जोडीला एक उत्तम प्रशासक, संशोधक व तज्ञ म्हणून देखील महिला पुढे आल्या पाहिजे.
“महिला सक्षमीकरण” अथवा “महिला सबलीकरण” हे विषय आज विविध स्तरातून अनेक वेळा हाताळण्यात येत असतात. परंतु शिक्षण मंच द्वारा आयोजित ही कार्यशाळा या सर्वश्रुत विषयांच्या पलीकडे आहे. प्रामुख्याने महिलांचा उच्च शिक्षणातील प्रशासकीय कामकाजातील आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा यादृष्टीने व याचे वेगळेपण म्हणजे “स्वयंसिद्धा” जाणीव-जागृती या कार्यशाळेनंतर पुढची पायरी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२० रोजी विद्याभारती महाविद्यालय येथे “स्वयंप्रभा”एक वाटचाल…या राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच द्वारा प्राध्यापक महिलांकरिता होणारे राज्यस्तरिय विशेष आयोजन. ज्यामध्ये महिलांचे नित्याचे प्रश्न न घेता एक वेगळा आयाम देण्यात आला आहे, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना एका मोठ्या व्यवस्थेचा भाग म्हणून महिलांनी आपल्या योगदानातून अधिकाधिक नाविन्यता आणि अचूकता आणणे आवश्यक असून या क्षेत्रातील संक्रमण पर्वावर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा,अधिनियम,परिनियम आणि नवीन शैक्षणिक धोरण या बद्दल अद्ययावत माहिती ठेवणे हि काळाची गरज आहे. या साठी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी विवध अडचणींवर मात करून आपले अस्तित्व सिद्ध करत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत अशा आदर्श महिलांचे या कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शन लाभणार आहे.
महिलांना आरक्षण देऊन तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध कायदे आज अस्तित्त्वात आहेत परंतु असे कायदे व नियम पर्याप्त आहेत काय? तसेच दरवर्षी फक्त “जागतिक महिला दिन” साजरे करून महिलाच्या दृष्टीने सामाजिक परिवर्तन घडून येणार काय? अशा अनेक प्रश्नाचा शोध घेणे आज आवश्यक आहे.शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तसेच महिलांना एका मोठ्या व्यवस्थेचा भाग म्हणून काम करताना, आहे त्या स्थितीत आणि आहे त्या स्थानावरून या व्यवस्थेमध्ये योगदान देणे क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीमध्ये महिलांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल, आपल्या मध्ये असलेल्या क्षमतेवर आणि आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी उपलब्ध असलेली साधन सामग्री याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे तसेच या व्यवस्थेमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची जाणीव असणे देखील गरजेचे आहे.
या कार्यशाळेमध्ये संपूर्ण राज्यभरातील प्राध्यापक महिलांकडून सक्रीय सहभाग अपेक्षित असून त्यांना शिक्षण क्षेत्रात आपले देनंदिन कर्तव्य पार पडताना कोणकोणत्या अडचणी येतात यावर उहापोह होणार आहे आणि महाराष्ट्र विद्यापीठ कायदा ची प्रत अलोकानासाठी मिळणार आहे. सोबतच स्वतःची ओळख केवळ एक शिक्षक म्हणून न राहता बहुआयामी व्यक्तिमत्व नावारूपास येण्यासाठी हि कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. महिलांमध्ये काम करताना संघटीत होऊन, नेतृत्वगुण वृद्धिंगत करण्यासाठी या क्षेत्रात आदर्श असलेल्या मा.डॉ.शशिकला वंजारी,कुलगुरू,एस.एन.डी. टी.विद्यापीठ,मुंबई,मा.कल्पनाताई पांडे, उपाध्यक्ष ABRSM, महिला संवर्ग,नवी दिल्ली, मा. डॉ.संगीता पकडे, संचालक, सिडनहॅम महाविद्यालय,मुंबई,मा.डॉ. मनीषा काळे, अधिष्ठाता,आंतर विद्याशाखा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती. मा.डॉ.स्मिता देशमुख, माजी अधिष्ठाता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.
त्याच प्रमाणे शिक्षण व्यवस्थेचा मुख्य भाग म्हणजे विद्यापीठ स्तराचे उच्चपदस्थ अधिकारी मा.डॉ.राजेशजी जयपुरकर, प्र-कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व शासन स्तरावरील अधिकारी मा.डॉ. केशव तुपे, सह संचालक, उच्च शिक्षण, अमरावती यांचे सुद्धा अमुल्य मार्गदर्शन या प्रसंगी लाभणार आहे.
तेव्हा शिक्षण मंच आणि आयोजन समिती द्वारा सर्व महिला प्राध्यापकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी https://forms.gle/xYxXUckZGj7Wue1W8 या संकेत स्थळावर आपले नाव नोंदवून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. संपर्क: प्राध्यापक डॉ.स्वाती शेरेकर,आयोजन सचिव-9404103800, डॉ.रेखा मग्गीरवार, आयोजन सहसचिव -9822576066,
डॉ. अंबिका जयस्वाल,आयोजन समिती सदस्य -9422917059