अकोला : शेती चे शिक्षण घेतलेल्या कृषी पदवीधारकांनी स्वतःच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कार्यकुशलतेचा प्रभावी वापर करून आपल्या गावाच्या शाश्वत विकासासाठी गरजेनुसार शासकीय, निमशासकीय किवा इतर विभागांची मदत घेत विकास साध्य करावा असे भावनिक आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडट डॉ. विलास भाले यांनी केले, अकोला येथील मुख्यालयी आयोजित “गणतंत्र दिन समारंभात” ते बोलत होते.
देश सर्वार्थाने विकसित होण्यासाठी गाव खेड्यांचा शाश्वत विकास हि प्राथमिकता असून कृषी-अकृषी विद्यापीठासह सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, सहकारी- सेवाभावी- खाजगी संस्थानी एकत्र येत गावांच्या गरजा लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने नियोजन केल्यास राष्ट्र अधिक प्रगत होईल असे आवर्जून सांगताना डॉ. भाले यांनी कृषी पदवीधराना विषेश्वत्वाने आवाहन करीत आपण कोणत्याही क्षेत्रात सेवारत असा मात्र आपल्या गाव खेड्यांकडे तेथील ग्रामस्थांच्या विकासासाठी योगदान द्या याकरिता उन्नत भारत अभियाना अंतर्गत विद्यापीठ आपले सोबत राहील असा विश्वास देखील आपल्या संबोधनात व्यक्त केला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सर्वच विभागांनी आपले सर्वोत्तम योगदान देत आपले कर्तव्य बजावीत शिक्षण, संशोधनासह कृषी विस्तार विषयक कार्य निरंतर सुरु ठेवले असून विद्यापीठाच्या राष्ट्रीय मानांकनात देशपातळीवर आघाडी घेत २६ व्या स्थानावर मजल मारली याबद्दल समाधान व्यक्त करताना डॉ भाले यांनी येत्या वर्षात राष्ट्रीय मानांकनात पहिल्या 10 विद्यापीठात येण्याचे ध्येय निश्चिती साठी उपस्थिताना आवाहन केले. भविष्यात शेती व्यवसायाला आणि पर्यायाने कृषी विद्यापीठांना अधिक महत्व प्राप्त होणार असल्याचे देखील कर्नल कमांडट डॉ. भाले यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण, भावपूर्ण भाषणात अधोरेखित केले. शेती आणि शेतकरी केंद्र बिंदू मानून आपले सर्वोच्च योगदान देणाऱ्या समस्त भूतपूर्व कुलगुरू,शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आपणा सर्वाचे अभिनंदन करताना कर्नल कमांडट डॉ. विलास भाले यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार विषयक कार्याचा वर्षभरातील लेखाजोखा उपस्थितांना सादर केला. आपल्या दैनंदिन कार्यासोबतच विद्यापीठ तथा शेती विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या, आपल्या विभागाचा सर्वांगीण विकास करण्याऱ्या कर्मचारी वर्गाचा सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव सुद्धा कुलगुरू महोदयांचे शुभहस्ते करण्यात आला. तर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यापीठाच्या कॅडेट्सचे रँक हस्तांतरण सुद्धा मा. कुलगुरू महोदयांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे,यांचे सह सर्व संचालक, सहयोगी अधिष्ठाता आदींनी स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे पूर्णाकृती पुतळ्याला आदरांजली अर्पण केली, कार्यक्रम स्थळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट, विद्यापीठ सुरक्षा विभाग आदींनी कुलगुरूना मानवंदना दिली. भारतीय संविधान उद्दिशेकेचे सामुहिक वाचना नंतर कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी राष्ट्रध्वज फडकाविला व राष्ट्रगीतानंतर सर्वाना संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर समूहगान सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. कोरोना विषयक नियमांचे पालन करीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना साठी उपकुलसचिव श्री.राजकुमार पोयाम व त्याचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.