मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधानसचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची’लोकशाही बळकटीकरणासाठी, करुया मतदान”या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 9 आणि गुरुवार दि.10 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र. एच. ठाकरे, औरंगाबाद जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांनी मतदार जागृती कार्यक्रमांची जिल्हानिहाय माहिती दिलेली आहे.
निवडणूकांत मतदान वाढावे याकरिता सुरु असलेले प्रयत्न, मतदार जागृतीसाठी आयोगामार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम, विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर, मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम, सदिच्छादूतांचा सहभाग, स्वीप या उपक्रमाचे यश या विषयांची माहिती श्री.बलदेव सिंह यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.