अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲड.गजाननराव पुंडकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ विलास सपकाळ उपस्थित होते. विद्यापीठ गीताने प्रारंभ झालेल्या समारंभात स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वि गो ठाकरे यांनी शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवाल सादर केला तसेच महावियालयाला गौरवान्वित करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वंकष यशाचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. एकाच महाविद्यालयाच्या तब्बल पाच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रथम दहाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करण्याच्या शैक्षणिक उन्नती सोबतच सांस्कृतिक, क्रीडा व वैज्ञानिक क्षेत्रात यशोशिखर पादाक्रांत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
यानंतर महाविद्यालयाचा झेंडा अनेक स्तरावर फडकविणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. एकूण ५१३ मध्ये ३४९ विज्ञान स्नातक, ६५ बिसीए स्नातक, ९९ स्नातकोत्तर व १० आचार्य पदवी विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या. यामधील ५ स्नातक तर ८ स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले. सोबतच ईतर ३५ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विविध विभागांनी प्रोत्साहनपर पुरस्कृत सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले.
पदक वितरणानंतर सोहळ्यास प्रमुख पाहुणे डॉ विलास सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या स्पर्धात्मक युगात जागतिक प्रवाहांमध्ये समरूप राहून आपल्या मध्ये योग्य ती कौशल्ये विकसित केल्यासच भविष्यात आपला टिकाव लागणार असल्याची जाणीव त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना करून दिली.
अध्यक्षीय भाषणात ॲड.गजाननराव पुंडकर यांनी विद्यार्थ्यांना भाऊसाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी पुस्तकांचे वाचन करावे व या संस्थेतून पदवी मिळाल्यानंतर त्या विचारांचे पाईक आपण झालो पाहिजे आणि त्याचाच प्रचार व प्रसार केला पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केल्या व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अर्चना बुरघाटे आणि डॉ मनीष गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी यशवंत विद्यार्थी,त्यांचे पालक तसेच शिक्षक उपस्थित होते. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अविरत प्रयत्न केले. या नेत्रदीपक सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.
सोहळ्याची वैशिष्ट्ये :
१. दिक्षांत समारंभाचा शिष्टाचार व साज
२. सुवर्णपदकांची लयलूट: गुणवत्ता धारक एकूण ५१ विद्यार्थ्यांना केल्या गेले सन्मानित
३. कु श्वेता महेश साहू विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके: विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान, महाविद्यालयातून गुणानुक्रमे सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्व. पी. झेड. देशमुख स्मृति सुवर्णपदक, भौतिकशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सुवर्णपदक आणि रसायनशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्व. विश्वनाथ बापुजी वढाळ स्मृति सुवर्णपदक
४. माजी विद्यार्थ्यांची मांदियाळी: ४०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित
५. विद्यार्थ्यांसाठी सभागृहाबाहेर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आणि स्वतंत्र छायाचित्र व्यवस्था