मुंबई : गेली पाच वर्ष भाजप सरकारने सातत्याने जनतेची फसवणूक केलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने त्याचेच उट्टे काढून जनतेने भाजपचे सुंभ जाळले तरी त्यांचा पीळ मात्र गेला नाही, असे दिसून येत आहे. मोठमोठ्या घोषणा करून जनतेच्या तोंडावर हजारो कोटींचे आकडे फेकायचे, प्रत्यक्षात मदत देताना मात्र हात आखडते घ्यायचे ही या सरकारची कार्यपद्धती वेळोवेळी दिसून आली आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीकरिता मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रूपयांची तरतूद केली असे जाहीर केले. परंतु काही दिवसांपूर्वी आलेल्या महापूरावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे कोटी रूपयांच्या मदतीची मागणी केली होती त्याचा एकही पैसा अद्याप पूरग्रस्तांना भेटला नाही. हे सरकारचे चरित्र दर्शवणारे आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, सत्तेत आल्यापासून या सरकारचे एकाच गोष्टीत सातत्य ठेवले आहे, ते म्हणजे फसवणूक करण्यात. ३७३ कोटींचे सावकारी कर्ज माफ करू असे सांगितले प्रत्यक्षात फक्त ३० कोटी माफ केले. कर्जमाफी जाहीर केली ती अद्याप ५० टक्के शेतक-यांनाही मिळाली नाही. १० हजार रूपये उचल योजना जाहीर केली पण तिचा फायदा फक्त ५१ हजार शेतक-यांनाच दिला. शेतीमाल हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली पण त्याचे चुकारे अद्याप दिले नाहीत. याही वेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दहा हजार कोटी रूपये देऊ असे जाहीर केले आहे. पण राज्याचा आपत्कालीन निधी फक्त दीडशे कोटी रूपयांचा आहे, तो वाढवण्याबद्दल अद्यापही निर्देश दिले नाहीत. राज्याची सद्याची आर्थिक परिस्थिती पाहता या करिता कर्ज काढावे लागेल का? याचीही चर्चा बैठकीत झालेली नाही. जोपर्यंत हे निर्णय होतील तोपर्यंत या सरकारची मुदत संपलेली असेल.
पीक विम्या संदर्भात कंपन्याशी चर्चा केली असे सांगणा-या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात ३६ टक्क्यांपेक्षा अधिक शेतक-यांचे पूर्वीचे पीक विम्याची भरपाई अजूनही दिली गेली नाही त्याबद्दल चकार शब्द या सरकारने काढलेला नाही. म्हणूनच थोडी फार संवेदना शिल्लक असेल तर दिखावा न करता ताबडतोब शुद्ध अंतःकरणाने जाहीर केली तेवढी मदत करून गेल्या पाच वर्षात केलेल्या पापाचे क्षालन करावे असे सावंत म्हणाले.