Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / ” महिला एक उत्कृष्ट व्यवस्थापक ” डॉ. मृणालिनी फडणवीस-कुलगुरू सोलापूर विद्यापीठ

” महिला एक उत्कृष्ट व्यवस्थापक ” डॉ. मृणालिनी फडणवीस-कुलगुरू सोलापूर विद्यापीठ

अमरावती : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील महिला प्रध्यापकांकरिता दिनांक २ ऑक्टोबर २०२० ला अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महिला संवर्ग, महाराष्ट्र प्रांत द्वारा राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचे आयोजन प्रथमत:च ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. सर्व राज्यातील महिला प्राध्यापाकांनी या सुवर्ण अक्षरात लिहल्या जाणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार राहून महिला सक्षमीकरण, सबलीकरण, आत्मनिर्भता व आत्मसन्मान जागृत करून समाजातील तळागाळातील उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थीनींसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे व आपले सामाजिक दावित्व आणि जबाबदारी पार पाडावी याकरिता उद्बोधन करण्यात आले.

अवघ्या महाराष्ट्राला भूषणावह अशा महिला प्राध्यापकांच्या अभ्यास वर्गाचे आयोजन प्रथमत:च आखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने  प्रा. प्रदीप खेडकर यांच्या नेतृत्त्वात व महाराष्ट्र प्रांत, महिला संवर्ग प्रमुख डॉ. मिनल ठाकरे भोंडे व त्यांच्या संपूर्ण कार्यकारणी सदस्यांच्या प्रयत्नाने आयोजित केले.महिला प्राध्यापकांच्या कामाचा गौरव व आत्मनिर्भयता तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर आणि राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कार्यकारणीवर  आपले मत मांडण्याकरिता अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. सदर अभ्यासवर्गातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि महिलांची भूमिका, कोव्हिड काळात महिला प्राध्यापकांचे योगदान, बहुआयामी उद्दिष्टपूर्ती व्यवस्थापन व महिला व ऑनलाईन अध्यापन या सारख्या विषयांवर चर्चा झाली  आणि  जेष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रथम उदघाटनीय सत्रामध्ये अभ्यासवर्ग अध्यक्ष मा. प्रदीपजी खेडकर, अध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक  महासंघ, महाराष्ट्र प्रांत  आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच व मा.प्रग्येशजी शाह, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षा प्रभारी यांची विशेष उपस्थिती होती तर या अभ्यासवर्गाचे उद्घाटक  डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ यांनी आपले मत मांडताना महिला प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी व कौटूंबिक जबाबदारी यामधून मध्यबिंदू साधून यशस्वी गृहिणी व एक प्राध्यापक कसे बनता येईल यावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. महिलांना आपल्या क्षेत्रात उंची गाठण्याकरिता, त्यांना अधिकाराकरिता, त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या वारंवार आयोजन करून महिलांना ऊर्जा देण्याची गरज आजच नाही तर नेहमीच राहणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. महिला एक उत्कृष्ट व्यवस्थापक असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या धोरणाबद्दल माहिती देवून नवीन शैक्षणिक धोरण महिलांच्या फायद्याचे आहे असे म्हटले.

सदर कार्यक्रमास डॉ. कल्पनाताई पांडे, उपाध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांनी उद्घाटन सत्राचे अध्यक्षीय स्थान भूषवून सहभागी प्राध्यापक महिलांना मार्गदर्शन करतांना महिलांनी आपले अस्तीत्व टिकवून ठेवण्याकरिता प्रयत्नशील असणे आवश्यक आहे असे नमूद केले आणि  त्यांनी आपल्या सोबत इतर महिलांना जोडून संघटन वाढवावे जेणेकरून आपणास आपल्या क्षेत्रातील विविध विषयाचे ज्ञान मिळून आत्मनिर्भय बनू शकाल असे मत व्यक्त केले. मा.प्रग्येशजी शाह, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षा प्रभारी यांनी आपल्या भाषणात महिलांना प्रेरणा देताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे उदाहरण देतांना मातृशक्ती महिलाशक्तीचा  त्याग  ही देशाच्या राष्ट्रशक्ती बनण्याकरिता फार महत्वाचा आहे असे म्हटले होते त्यांनी स्त्रियांना अशाप्रकारचा सन्मान दिला. त्यांनी आपल्या भाषणात प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनांमध्ये काम करत असतानां संघटन से हम, हम से संघटन अशा प्रकारचा मंत्र मनात ठेऊन संघटने करीत काम करत राहावे असा सल्ला दिला.

राज्यस्तरीय महिला अभ्यासवर्गाच्या प्रथम उदघाटनीय सत्राची सुरुवात डॉ. पूर्णिमा दिवसे, अमरावती यांच्या मधुर आवाजातील सरस्वती वंदनेने करण्यात आली तर या अभ्यासवर्गाच्या आयोजनामागची भूमिका डॉ. मीनल ठाकरे भोंडे, महाराष्ट्र प्रांत, महिला संवर्ग प्रमुख यांनी आपल्या प्रास्ताविकामधून व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय डॉ. तक्षशिला मोटघरे, यवतमाळ व प्रा. सोनल कामे, अकोला यांनी दिला तर डॉ. रेखा मग्गीरवार, प्रशिक्षण प्रकोष्ठ प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन जबाबदारी उत्कृष्टपणेपार पाडली.व्दितीय सत्राच्या प्रथम वक्ता डॉ. सुवर्णा रावळ, उप-प्राचार्य, बी.एन.एन.कॉलेज,भिवंडी (ठाणे) यांनी या अभ्यासवर्गामध्ये प्राध्यापक महिलांना शिक्षण क्षेत्रातील बदलांबद्दल अवगत करण्याच्या दृष्टीने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि महिलांची भूमिका” या विषयावर आपले मत मांडताना आपल्या भाषणात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील विविध प्राधिकरणावर शिक्षकांचे प्रतिनिधीत्वाबाबत मार्गदर्शन केले तसेच आतापर्यंतच्या राष्ट्रीय शिक्षण प्रणालीचे झालेल्या बदलाची माहिती देत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात झालेला बदल आज नवीन पिढीकरिता कसा सुसंगत आहे हे त्यांनी उपस्थितांना उदाहरणासह समजावून सांगितले.

तर व्दितीय वक्ता प्रा. डॉ. संगिता जगताप, विभाग प्रमुख, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदरा यांनी “कोव्हिड काळात महिला प्राध्यापकांचे योगदान” या विषयावर मार्गदर्शन करताना विविध महिला प्राध्यापकांनी कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या काळात केलेल्या योगदानांबाबत तसेच महाविद्यालयात केलेल्या विविध सामाजिक कार्याचा विस्तृत लेखाजोखा मांडला. संपूर्ण जगभर मुत्यूचे तांडव करणाऱ्या कोविड १९ च्या प्रादुर्भावाने सगळीकडे लॉकडाउन मुळे जणू जीवन थांबल्याचे प्रथमच आपल्या पिठीने अनुभवले तरीही अशा परिस्थितीत सुद्धा न खचून जाता आपले कुटुंब व व्यावसायिक जबाबदारी पार पाडण्याचे उत्कृष्ट काम महिला प्राध्यापकांनी या काळात केले असे मत मांडले. व्दितीय सत्रातील प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. अनुराधा जोशी, नांदेड विद्यापीठ व डॉ. प्रज्ञा जंगले, जळगाव यांनी दिला तर कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रदर्शन डॉ. कामिनी मामर्डे, बुलढाणा यांनी केले.

तृतीय सत्रातील प्रथम वक्ता डॉ. रेखा मग्गीरवार, सहयोगी प्राध्यापक, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांनी “बहुआयामी उद्दिष्टपूर्ती व्यवस्थापन”या महिलांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर हितगुज करतांना अष्टभूजा दूर्गाने ज्याप्रमाणे आपल्या अष्ट हातांनी संकटनिवारण केलं त्याप्रमाणे कौटुंबिक जीवनात आणि महाविद्यालयीन जबाबदारी सोबतच सामाजिक आयुष्यात अष्टावधानी सर्व महिला प्राध्यापक आपले कार्य करत आहेत असे सांगितले. भारतीय स्त्री ही बहुआयामी असून संपूर्ण जगामध्ये तिच्या तारक, मारक व प्रेरक अशा प्रकारच्या काम करण्याच्या क्षमतेची तिची ओळख आहे. कुटुंबात ती कधी कन्या, बहीण, पत्नी, आई, सून आणि सासू अशा प्रकारच्या भूमिका बजावतांना कार्यक्षेत्रात व समाजात विविध पदावर  सक्षमपणे सर्व कार्याला न्याय देत असते असे मत व्यक्त केले.  आपल्या कार्यक्षेत्रात व समाजात वक्तृव, कर्तृत्व व नेतृत्व या तीनही आघाडीवर सक्षमपणे स्वतःला सिद्ध करणाऱ्या महिला प्राध्यापकाच्या कार्याचा गौरव करून राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने एकप्रकारे महिलांना प्रोत्साहन दिले असून या सन्मानाने महिला प्राध्यापकांना आपले कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे. तृतीय सत्रातील व्दितीय वक्ता प्रा.डॉ. स्वाती शेरेकर, संगणक शास्त्र विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी  “महिला व ऑनलाईन अध्यापन” याविषयावर महिला प्राध्यापकांना ऑनलाइन शिक्षणासाठी विविध अँपसोबतच अद्ययावत ज्ञानाचे तंत्रज्ञान अवगत करून काळानुरुप आपण आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे कसे गरजेचे बनले आहे व ते कसे वापरावे या बाबत त्यांनी उदाहरणासह आपल्या सादरीकरणात मांडले.  तृतीय सत्रातील प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. महानंदा दळवी, औरंगाबाद व डॉ. विजेता सिंग, जळगाव  यांनी दिला तर कार्यक्रमाचे निवेदन व  आभार प्रदर्शन डॉ. सुजाता कुलकर्णी यांनी केले.मा. प्रा.प्रदिपजी खेडकर, आखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, महाराष्ट्र राज्य, प्रांत अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य  प्रांतातील महिला संवर्गाच्या कार्यकारिणीद्वारे अशा प्रकारचे मार्गदर्शनाची का गरज भासली या बाबत आपले विचार मांडताना यापूर्वी महिला प्राध्यापकांना शिक्षण क्षेत्रातील बदलाची जाणीव नव्हती असे नाही मात्र त्यांना पुढाकार घेऊ दिल्या जात नव्हता. आमच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा महिलांकरिता अशा प्रकारची राज्यस्तरीय अभ्यासवर्ग घेण्याची संकल्पना समोर आली. या मध्ये महाराष्ट्रातील सर्व महिला प्राध्यापक एकत्रित आणण्याचे कार्य आमच्या महिला संवर्गाच्या प्रमुख डॉ. मीनल ठाकरे भोंडे व सर्व सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन करून या कार्यक्रमास यशस्वी केले याचा मला अभिमान आहे असे म्हटले.

आपण सर्व अशाच प्रकारे विविध विद्यापीठ प्राधिकरणावर, आपल्या महाविद्यालयातील विविध समितीवर तसेच  आपल्या कुटुंबाला वेळ देऊन आयुष्याचे योग्य नियोजन करावे जेणेकरून आपले व समाजाचे नक्कीच उत्थापन होईल अशी प्रतिक्रिया दिली. या अभ्यासवर्गाचा समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य वक्ता मा. महेंद्रजी कपूर, संघटन मंत्री, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांनी आपल्या भाषणात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, महाराष्ट्र प्रांत, महिला संवर्ग यांच्या “महिला व सामाजिक स्वास्थ” याविषयावरील प्रेरणादायी अभ्यास वर्गाच्या कल्पनेबाबत व उत्कृष्ठ आयोजनाबाबत स्तुती करत महिला प्राध्यापक सुद्धा शैक्षणिक क्षेत्रातील अविभाज्य अंग असून त्यांचे प्रश्न, त्यांची भूमिका, त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे असून अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे त्यांना आणखी ऊर्जा मिळते व त्यांच्या विविध भूमिका समाजामध्ये प्रखरपणे मांडण्यास सर्व महिला सक्षम होतील असे मत मांडले. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतच संघटन कार्यात देश, समाज व कुटुंब विकासामध्ये त्यांनी अविभाज्य भूमिका निभावल्या आहेत अशा सर्व महिला प्राध्यापकांना त्यांनी नमन करून त्यांनी केलेल्या कार्याचे गुणगान केले. चतुर्थ सत्रातील कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. निभा उपाध्याय, अकोला यांनी दिला तर कार्यक्रमाचे निवेदन व  आभार प्रदर्शन डॉ. रेखा मग्गीरवार, अमरावती यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. सोनाली शिलेदार यांच्या सोबत सर्वांनी शांतिपाठ म्हणून झाली.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *