अमरावती : अमरावती विभागातील विद्यमान शिक्षक आमदारांनी त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात शिक्षकांच्या कोणत्याही समस्या सोडविल्या नाही हे वास्तव आहे. परंतू तरीही ‘मी शिक्षकांचा आणि शिक्षक माझे’ असा कांगावा करत शिक्षकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ज्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांचा घात केला त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची वेळ आता आली असून आपल्यातील एका शिक्षकालाच शिक्षक आमदार म्हणून निवडून दिल्याशिवाय आपल्या समस्या दूर होणार नाहीत असे प्रतिपादन शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी केले.
शिक्षण संघर्ष संघटनेचा धामणगाव रेल्वे तालुकास्तरीय मेळावा काल पार पडला. यावेळी शिक्षकांना संबोधित करताना संगीता शिंदे बोलत होत्या. या मेळाव्याला मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रविंद्र कोकाटे, कार्याध्यक्ष अशोक चोपडे, संस्था व शाळा चालक मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम करडे, माजी सचिव प्रविण दिवे, संघटनेचे मार्गदर्शक नितीन गुडधे, धामणगाव तालुका अध्यक्ष अनंत डुमरे, मुख्य संघटक मिलिंद देशमुख, तालुका सचिव अविनाश चाफले, संजय शिरभाते, प्रसिद्धी प्रमुख गोविंद कपिले, चाफले मॅडम, पावडे, श्रीकांत देशमुख, घुलक्षे, संघटनेचे कार्याध्यक्ष शरद तिरमारे, सचिव विकास दिवे तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमरावती विभागातील विद्यमान शिक्षक आमदारांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळविला. स्वत: ते सरकारमध्ये सामील होते. परंतू तरीही ते शिक्षकांच्या साध्या समस्या सोडवू शकले नाहीत. त्यांनीच आपल्या शासकीय अनुदानित शाळांना अडचणीत आणणाऱ्या कंपनी विधेयकावर स्वाक्षरी देखील केली. म्हणजे आज शिक्षकांच्या नोकऱ्याच अडचणीत आणण्याचे काम या शिक्षक आमदारांनी केले आहे. हे आमदार महोदय, खरोखर शिक्षकांच्या हिताचा विचार करतात का ? असा सवाल संगीता शिंदे यांनी या मेळाव्याप्रसंगी केला.
जुनी पेंशन असो, शाळांना अनुदान असो, वरिष्ठ आणि निवड श्रेणी असो किंवा टीईटीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न असो शिक्षण संघर्ष संघटनेने प्रत्येक बाबतीत नेटाने लढा देण्याचे काम आजवर केले आहे. आणि प्रत्येक बाबतीत शेवटच्या टोकाला जाऊन लढा देण्यात संघटना पुढे राहिली आहे. शिक्षक आमदार म्हणून मला संधी मिळाली तर कधीही नॉट रिचेबल न राहता शिक्षकांना थेट माझ्याशी संवाद साधून आपली प्रश्ने मांडता येतील. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील न राहता शिक्षकविरोधी निर्णयप्रक्रियेविरोधात माझा लढा असेल असे ठाम आश्वासन देखील संगीता शिंदे यांनी यावेळी दिले. यावेळी रविंद्र कोकाटे, घनश्याम करडे, अशोक चोपडे यांनी देखील आपण सारासार विचार करूनच संगीता शिंदे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याव्यतिरीक्त कोणताही उमेदवार शिक्षकांच्या समस्या सोडवू शकणार नसल्याने संगीता शिंदे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.
ही वेळ परिवर्तनाची आहे……………………
शिक्षक मतदार संघावर बाहेरच्या भांडवलदारांनी अतिक्रमण केले असून आता वेगवेगळी आमिषे देऊन, पार्ट्या देऊन, विविध साहित्याचे वाटप करून शिक्षकांची मते आपल्याला मिळतील असा समज त्यांचा झालेला आहे. परंतू आता जर आपण सावध झालो नाही तर आपल्या शिक्षक बांधवांच्या समस्या कधीही सुटणार नाहीत. त्यामुळे आता ही वेळ परिवर्तनाची असून कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन संगीता शिंदे यांनी यावेळी केले.