जागतिक महासत्ताक होण्याकडे अग्रेसित आपला भारत देश युवकांचा देश म्हणून सुद्धा लौकिकास पात्र असून जगाच्या पाठीवर जवळपास प्रत्येक देशात विविध क्षेत्रात आपले तरुण अस्तित्व अधोरेखित करीत आहेत ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे नमूद करतांनाच देशांतर्गत शेती, शेतकरी आणि एकंदरीतच समाजाला तारक ठरणारे शाश्वतसंशोधन कालसुसंगत ठरेल असे आशादायी प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत दोन दिवसीय अंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा “आविष्कार २०१९” चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गरज हि शोधाची जननी असून अन्न धान्य उत्पादनात आपल्या संशोधकांनी उच्चांक गाठले असून आता बदलत्या जीवन शैलीला पूरक आहार, गाव पातळीवर उत्पादित मालावर गावातच प्रक्रिया आणि कृषीमालाची गावातूनच निर्यात हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत संशोधन निश्चित करण्यावर भर देतांना डॉ. भाले यांनी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ सामान्य कुटुंबांमध्ये जन्मले असून त्यांच्यातील प्रयोगशील वृत्तीने ते लौकिकास पात्र ठरले व त्यांचे संशोधन आजही अजरामर असल्याचे गौरवोद्गार काढत युवकांना मार्गदर्शन केले.अगदी लहान लहान गोष्टी मधून नाविन्यपूर्ण संशोधन उदयास येते आणि कृषी क्षेत्रात तर संशोधनाला अमर्याद संधी उपलब्ध असल्याचे सांगताना विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात येत असून गतवर्षी राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत दुसऱ्या स्थानावरून यंदा प्रथम स्थानावर भरारी आवाहन सुद्धा डॉ. भाले यांनी उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना केले व कृषी अभियांत्रिकी क्षेत्र भविष्यातील क्रांतिकारक ठरणार असल्याने त्याकडे विशेष लक्ष देण्याचे सुचविले. याप्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांचेसह आयोजन समिती अध्यक्ष तथा सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. ययाती तायडे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक डॉ. ययाती तायडे यांनी केले, सूत्र संचालन डॉ. मोहिनी डांगे यांनी तर डॉ. दारासिंग राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.
उद्घाटनसत्रानंतर मा. कुलगुरू तथा इतर सर्व मान्यवरांनी संशोधक विद्यार्थ्यानी प्रदर्शित केलेल्या संशोधनात्मक पोस्टर व प्रतिकृतीचे अवलोकन केले व विद्याथ्यामधील संशोधक वृत्तीचे कौतुक केले. आज एकूण १३ महाविद्यालयांनी सहभागी होत पदवी अभ्यासक्रम मध्ये 46 , पदव्युत्तर 4 आणि आचार्य 1 तथा २ प्राध्यापक यांनी सहभाग घेतला व आपले सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गोठ्यातून शेण उचलण्याचे संयंत्रा पासून तर मानवी केसापासून अमिनो असिड तयार करणे सह उन्नत ग्राम, डी एन ए मधील बदल आदी सर्वच विषयात आपले प्राविण्य प्रदर्शित केले. महोत्सवाचे यशस्वी आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. ययाती तायडे यांचे सह विविध समिती अध्यक्ष, सचिव तथा इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.