मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बीड जिल्ह्याचे ‘विकासपर्व’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले .
बीड जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, जलयुक्त शिवार, आरोग्य केंद्र, प्रशासकीय इमारती, यासह अनेक योजना यशस्वीरित्या राबवल्या. महा आरोग्य शिबीराचे आयोजन करून शेकडो गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य उपचार उपलब्ध करून दिले. शेतक-यांना विमा तसेच वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान मिळवून दिले. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात घेतलेला विकासाचा ध्यास, पूर्ण झालेली व प्रगतीपथावर असलेली कामे याचा एकत्रित चित्रमय लेखाजोखा या ‘विकासपर्व ‘ कॉफी टेबल पुस्तकामधून मांडण्यात आला आहे.
मुंबई येथील शासकीय निवासस्थानी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दिलीप कांबळे, खासदार विकास महात्मे, अमर साबळे, माजी खासदार सुनिल गायकवाड, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदी उपस्थित होते.