चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार पारोमिता गोस्वामी यांच्या प्रचारकरिता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विशाल जनसभेला संबोधित केले.
ब्रह्मपुरी येथे आल्यावर काही काळ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते त्यावेळी तेथील वीज पुरवठा बंद होता. आपल्या भाषणात भाजप सरकारवर टीका करतांना त्यांनी म्हंटले की, जर शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्र्याला हा अनुभव येत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील? त्याच बरोबर प्रलंबित गोसीखुर्द प्रकल्पाचा ही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला, गेल्या ३५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित आहे यावरून राज्य कारभारातील प्राथमिकता दिसून येते.
“गेल्या ७० वर्षांत राज्यातील सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष सामान्य राजकीय इच्छाशक्ती अभावी जनतेचे जीवन सुसह्य करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. आप उमेदवार श्रीमती पारोमिता गोस्वामी गेल्या २० वर्षांपासून आदिवासी आणि महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत, ब्रह्मपुरी मतदारसंघातून पारोमिता गोस्वामी विजयी झाल्यास दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे आप सरकारने काम केले आहे त्याच धर्तीवर या मतदारसंघात त्या काम करतील.”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विश्वास व्यक्त केला.
आपल्या दिल्ली सरकारच्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरी बद्दल माहिती देताना त्यांनी मोफत उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी, २०० युनिटपर्यंत मोफत वीज यामुळे दिल्लीतील सर्वसामान्य विकासाचा केंद्रबिंदू समोर ठेवून जनसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे.
आता वेळ आली आहे महाराष्ट्रात देखील दिल्ली राज्य सरकारप्रमाणे काम होण्याची गरज आहे आणि पारोमिताजी निवडून आल्यावर त्याच प्रमाणे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी आणि महिलांच्या हक्कांसाठी पारोमिता गोस्वामी यांनी भरीव योगदान दिले आहे त्यामुळे येथील घराघरात त्यांचे नाव माहिती आहे. राज्यातील कुठल्याही मतदारसंघात अशा प्रकारे महिलांच्या, आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढणारी उमेदवार इतर कुठल्याही राजकीय पक्षाने दिलेला नाही.
यावेळी आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या प्रिती शर्मा मेनन, प्रदेश संयोजक रंगा राचुरे, युवक आघाडी अध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य कार्यकारणी सदस्य देवेंद्र वानखेडे आणि जगजितसिंग उपस्थित होते.