नागपूर :विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलिस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिल्यात.
बचतभवन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच विधानसभानिहाय निवडणूक अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलिस अधीक्षक राकेश ओला,पोलिस उपायुक्त निर्मला देवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारीरविंद्र खजांजी, पोलिस उपायुक्त निलोत्पल, राहुल माकणीकर, विक्रम साळी, विवेक मसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे, श्रीकांत उंबरकर, डॉ. शिवनंदा लंगडापुरे, श्रीमती हेमा बडे, श्याम मदनूरकर, अतुल म्हेत्रे, हिरामण झिरवाळ, शेखर घाडगे, श्रीमती शीतल देशमुख, श्रीमती सुजाता गंधेउपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काम करताना कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सतत वरिष्ठांच्या संपर्कात राहून, अडचण असेल तिथे मार्गदर्शन घ्यावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान संवेदनशील आणि दक्ष राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीन आणि तहसील कार्यालय परिसरात तीन अशी एकखिडकीच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहेत. तर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची नामनिर्देशन पत्रेही त्या-त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत.
यावेळी ग्रामीण मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रे स्विकारताना पोलिस उपविभागीय अधिकारी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी समन्वय ठेवून त्या ठिकाणी उमेदवारासोबत फक्त तीन वाहनांनाच परवानगी द्यावी. त्यामुळे परिसरात गर्दी होणार नाही आणि वाहतुकीस अडथळा येणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.
शहरातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारासंघातील उमेदवार कदाचित एकाच दिवशी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची शक्यता लक्षात घेता, उप जिल्हा निवडणूक अधिकारी व पोलिस यंत्रणेने 100 मीटरपरिसरात वाहनांची गर्दी होणार नाही, याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिल्या.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधीत मतदारसंघातील पोलिस अधिकारी यांनी वेळोवेळी भेट घेऊन समन्वय साधावा.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारमतदारसंघातील जबाबदारी पार पाडत असताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास वरिष्ठांना अवगत करावे. निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.