यवतमाळ : ज्यांच्याकडून प्राम्प्ट पेमेंट अपेक्षित आहे अशा जिल्हयातील ११ हजार १७ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाचे २९ कोटी ९३ लाख रूपयापेक्षा जास्त थकबाकी वाढल्याने महावितरणने या ग्राहकांविरूध्द आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मोहिम आखली आहे. शंभर टक्के कारवाईचे उध्दीष्टे असणाऱ्या या मोहिमेत कारवाई झाली कि नाही याची पडताळणी करण्यासाठी परिमंडळ कार्यालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जिल्हयात आकस्मिक भेटी देऊन तपासणी करणार आहे.
सर्व विभागीय कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वात आखण्यात आलेल्या या मोहीमेत थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयाने २९ फेब्रुवारीचे उध्दीष्ट दिले आहे. त्यामुळे नियमीत वीज बिलांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना अडथळा ठरणाऱ्या या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही पुर्व सूचना न देता कारवाई करणार असल्याचे निर्देश मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ श्रीमती सुचित्रा गुजर यांनी दिले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महावितरणच्या तीनही विभागाचा आढावा घेतला तर यवतमाळ विभागातील ४ हजार १३० वाणिज्यिक ग्राहक असे आहेत की ,ज्यांच्याकडे सर्वात जास्त म्हणजे १२ कोटी ७१ लाख १२ हजार रूपये वीज बिलाचे थकित आहे. पुसद विभागातील ०२ हजार ८२१ ग्राहकांकडे ०८ कोटी २७ लाख , तर पांढरकवढा विभागातील २ हजार ३८९ ग्राहकांकडे ०६ कोटी ३७ लाख रूपये वीज बिलाचे थकित आहे.
औद्योगिक ग्राहकाचा विचार केला तर हिच थकबाकी यवतमाळ विभागातील ६४५ ग्राहकांकडे ९४ लाख ८० हजार रूपयाची आहे.