मुंबई : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. राज्यभरात भाजपाविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. नव्या जोमाने कामाला लागा, विजय आपलाच आहे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. थोरात यांनी काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन,
दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अकोला,
वाशीम, धुळे, नंदूरबार आणि नागपूर या जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिका-यांची
बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, प्रदेश
सरचिटणीस मोहन जोशी, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, विनायक देशमुख आदी उपस्थित
होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीबाबत
आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या
तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार घेऊन जनतेपर्यंत जावे आणि संघटनात्मक बांधणी करावी. काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत आहे. सर्वांनी मेहनत घेऊन काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवल्यास काँग्रेसला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खालील निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
१. नागपूर – आ. सुभाष धोटे, शेखर शेंडे
२. अकोला – माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, रविंद्र दरेकर
३. वाशिम – तुकाराम रेंगे पाटील, प्रफुल्ल गुडधे पाटील
४. धुळे – डॉ. कल्याण काळे,
५.
नंदुरबार – विनायक देशमुख,
ज्ञानेश्वर गायकवाड
बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ. थोरात म्हणाले की, नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला अद्याप बॉल दिसला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतक-यांना मदत देण्याबाबत खूप उशीराने राज्यपालांना भेटले, आम्ही अगोदरच शेतक-यांच्या प्रश्नांवर राज्यपालांची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केलेली आहे.