Panjabrao Dakh Live 26 एप्रिलपासून राज्यात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज
पुणे: प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 26 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. संभाजीनगर, जालना, नगर, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
डख यांच्या मते, सर्वत्र पाऊस पडणार नसला तरी अनेक भागांत रात्रीच्या वेळेस जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक संरक्षणाची तात्काळ व्यवस्था करावी.
27 एप्रिलपासून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सीमेलगत पुन्हा पावसाचे संकेत
डख यांनी पुढे सांगितले की, 27 एप्रिलपासून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागांत पाऊस होणार असून, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांवरही होईल. यामध्ये कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि यवतमाळ या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस तुरळक स्वरूपाचा असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कांदा आणि हळदीच्या काढणीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता
राज्यात सध्या कांदा काढणी आणि हळदीची कामे सुरू असल्यामुळे डख यांनी सर्व शेतकऱ्यांना 2 मे 2025 पर्यंत कांदा आणि हळदीची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तीन ते सहा मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात खराब हवामान, वादळी वारे आणि अवकाळी पावसाचे जोरदार सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
सीमावर्ती भागात विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला
धर्माबाद, कंधार, अक्कलकोट, औसा,उमरगा, जत, उमदी, कोल्हापूर, सांगली आणि राधानगरी भागांमध्ये 26 ते 28 एप्रिल दरम्यान अवकाळी वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने या भागांतील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आज रात्रीपासून वाऱ्याचा जोर वाढणार, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
डख यांनी सांगितले की, 26 एप्रिलच्या रात्रीपासून अनेक भागांत जोरदार वारे वाहतील. जिथे पाऊस नाही पडणार, तिथेही वाऱ्याचा मोठा जोर जाणवेल. त्यामुळे आज रात्रीपासून सर्व शेतकऱ्यांनी पीक संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करावी आणि अचानक वातावरणात होणाऱ्या बदलाची तयारी ठेवावी.